Wednesday, April 26, 2017

मसालेभात

लग्नांचा season सुरु झालाय आणि लग्नातल्या जेवणाचा पण. असं समजा की तुम्हाला एका लग्नाचं बोलावणं आलं, वधू वराच्या डोक्यावर अक्षता टाकून तुम्ही तडक जेवणाच्या हॉल कडे वळता. तिथे तुमच्या सारख्या चतुर लोकांची आधीच  गर्दी उडालेली असते. गर्दी तुन वाट काढून तुम्ही एका बाजूला सरकता आणि तुम्हाला दिसतात ओळीत मांडलेली पानं आणि त्यात उरलेल्या दोन रिकाम्या खुर्च्या. तुम्ही पटकन त्यातली एक खुर्ची पकडता आणि स्वतःवरच खुश होत वाढप्यांची वाट बघता.

पानं वाढायला सुरुवात होते, मस्तपैकी बासुंदी, पुरीचा बेत असतो. तुम्हालाही सडकून भूक लागलेली असते, म्हणून बासुंदी वर आडवा हात मारायचे मनसुबे तुम्ही रचता. पण पुरीवाला वाढायला येतो तेव्हा फेरारी च्या वेगाने "पुरी... पुरी... पुरी... पुरी...." असं म्हणत तुम्ही "हो, चार" असं म्हणेपर्यंत दहा पानं पुढे पोहोचलेला असतो. जेमतेम एकदा त्याच्या भांड्यात उरलेल्या दोन पुऱ्या मिळवल्यावर तर तो बेपत्ताच होतो. त्याची वाट बघत तुम्ही आपलं बाकीचे पदार्थ संपवण्याच्या मागे लागता. शेवटी बराच वेळ वाट बघूनही तो येत नाही म्हणून तुम्ही मसाले भात वाढणाऱ्याला "हो" म्हणता. यजमानांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्हाला काही कळायच्या आत तो तुमच्या पानात मसालेभाताचा डोंगर रचून पुढे निघून जातो. आता एवढा भात कसा संपवायचा हे संकट तुमच्यापुढे उभं रहातं.

तो डोंगर अर्धा पार केल्यावर अचानक पुरी वाला उगवतो आणि तुमच्या मनाची द्विधा अवस्था करून ठेवतो. तिकडे वाटीतली बासुंदी खुणावत असते आणि रस्त्यात अर्धा उरलेला मसालेभात वाट अडवून उभा असतो. अगोदरच आधीच्या अर्ध्या भाताने पोट तुडुंब भरलेलं असतं. पानात टाकलेलं बरं दिसत नाही म्हणून नेटाने उरलेला अर्धा भट तुम्ही संपवत असता, त्यात पूरी घ्यावी तर लोक अधाशी म्हणतील, वरून भात टाकावा लागेल तो वेगळा. म्हणून वाटीतल्या बासुंदीच्या खाणाखुणांनकडे दुर्लक्ष करून तुम्ही जड मनाने पूरी वाल्याला "नाही" म्हणता.

पोटातला भरता येण्यासारखा प्रत्येक कानाकोपरा मसालेभाताने भरून तुम्ही विजयी मुद्रेने एका हाताचा आधार घेत, जडावलेलं पोट सांभाळत उठता. तोपर्यंत हॉल मधली गर्दी कमी झालेली असते. हात धुवायला जातांना तुम्हाला लक्षात येतं कि जेवणासाठी पंगत आणि बुफ्फे अश्या दोन्ही व्यवस्था होत्या, आणि बुफ्फे मध्ये पाणीपुरी, दहीवडा, छोले टिक्की, लाईव्ह पाव भाजी काउंटर, पंजाबी, चायनीज, इटालियन, मेक्सिकन, असे अनेक काउंटर्स होते आणि सहज मिळत असलेल्या पंगतीतल्या जागेसाठी तुम्ही हे सगळं घालवलंत पण तोवर वेळ निघून गेलेली असते, पोटात हवा शिरायला सुद्धा जागा उरलेली नसते. त्या सगळ्या काउंटर्स चे वास घेत, पोटातल्या मसालेभाताला सांभाळत तुम्ही हात धुवून तिथून बाहेर पडता.

आयुष्यं पण असंच काहीसं आहे. सजहपणे मिळतंय म्हणून आपण मिळत असलेली पहिली खुर्ची पकडतो आणि तिला  चिकटून बसतो. स्वप्नातली पूरी नशिबात नाही असं समजून मसालेभाताला "हो" म्हणून बसतो, आणि एकदम एक दिवस स्वप्नातली परी .... सॉरी... आय मीन पूरी अवचित आपल्या आयुष्यात अवतरते, पण तोवर मसालेभाताला शब्द दिलेला असतो, म्हणून आपण मसालेभाताशी निभावत बसतो. आणि आयुष्याच्या शेवटी लक्षात येतं कि अरेच्या पूरी आणि मसालेभातापलीकडे देखील बघण्यासारखं, करण्यासारखं, चाखण्यासारखं बरंच काही होतं जे आपण सेक्युअर्ड खुर्ची पायी गमावून बसलो.
© गायत्री गद्रे


तुम्हाला आवडेल असं अजून काही - 


बुवा आहे तिकडे                                                                                                                   

Monday, April 17, 2017

कूपमंडूक

काही दिवसांपूर्वी मला WhatsApp वर एक जोक आला. अमित फेसबुक वर मेसेज टाकतो कि ट्रम्प प्रेसिडेंट झाला, आता अमेरिकेचं आणि पर्यायाने जगाचं कसं होणार, त्यावर मिलिंद त्याला कंमेंट टाकतो, "तू शनिवार पेठेत राहतोस तिथे ३ दिवस पाणी येणार नाहीये, त्याची चिंता कर". आणि एकदम माझ्या डोळ्यांसमोर हरी अण्णा उभे राहिले.

कूपमंडूक! मला नक्की आठवत नाही मी हा शब्द पहिल्यांदा केव्हा ऐकला, पण त्याचा अर्थ नं कळण्याएवढी लहान होते एवढं नक्की. चौथीच्या scholarship परीक्षेच्या तयारीच्या वेळेस हा शब्द पुन्हा मला भेटला, आणि तेव्हा मला त्याचा खरा अर्थ कळला आणि अर्थ कळल्याबरोबर माझ्या डोळ्यांसमोर हरी अण्णांचा चेहरा आला. त्यानंतर अनेक वर्ष कोणी कूपमंडूक म्हणालं कि माझ्या डोळ्यासमोर हरी अण्णा त्यांच्या घराच्या विहिरीतून आपलं बेडकासारखं डोकं बाहेर काढून, डोळ्यावरचा चष्मा सरसावून आजूबाजूला बघताहेत आणि नाकातून नापसंतीचा सूर काढून, तोंड वाकडं करून विहिरीतल्या त्यांच्या नेहमीच्या कट्ट्यावर परत जाऊन आपलं दात कोरण्याचं काम पूर्ववत सुरु ठेवताहेत असं चित्र माझ्या नजरेसमोर यायचं.

तसं आमचं गाव एकदम लहान, त्यामुळे सगळे लोक ओळखीचे. जसजशी मोठी होत गेले तस तसं कुपमंडूकाचं चित्र बदलत गेलं. ते कधी वडिलोपार्जित घरात आणि दुकानात बरोब्बर मध्ये भिंत टाकून दोन्ही दुकानात हुबेहूब एकसारख्या गोष्टी विकणाऱ्या छगनलाल आणि मगनलाल सारखं दिसू लागलं तर कधी मुलाला शहरात जाऊ दिलं तर तो म्हातारपणी आम्हाला सांभाळणार नाही असं म्हणणाऱ्या शेवंताबाईंसारखं दिसायला लागलं. दहावी पास  करेपर्यंत तर त्या मंडूकाने विश्वरूप धारण केलं होतं. म्हणजे मला आमचं अक्ख गावच एक विहीर आहे आणि त्यात राहणारे आम्ही सगळे एक एक कूपमंडूक आहोत असा भास व्हायला लागला. आयुष्यात पहिल्यांदा "इथून बाहेर पडा , मोठे व्हा, इथे काही ठेवलेलं नाही" या आई बाबांच्या वाक्याचा अर्थ कळायला लागला.

कशी गंमत असते बघा ना, म्हणजे मला असं वाटायचं कि एकदा या गावाबाहेर पडलं कि विशाल जग भेटेल, जिथे लोकं कूपमंडूक नसतील, त्यांचे विचार संकुचित नसतील, शहरातले लोकं बऱ्याचदा गावाकडच्या लोकांना तुच्छ लेखतात (म्हणजे निदान माझ्या बघण्यात तरी असे शहरातले बरेच लोकं आले होते) म्हणजे त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन फार मोठा असेल असं वाटायचं. आणि या समजामुळे मी काही चमत्कारिक प्रसंगात पण अडकले. कॉलेज संपता संपता ९/११ चा अतिरेकी हल्ला झाला तेव्हा मी एका परिचितांच्या घरी बसले होते, बातम्या बघून माझा चेहरा चिंताक्रांत झाला, ते बघून ते काका मला म्हणाले होते "तुझा सक्खा भाऊ त्या ट्विन टॉवर मध्ये असल्यासारखा सुतकी चेहरा का केला आहेस? ते तिकडे अमेरिकेत चालले आहे, इथून लाखो मैल दूर". सगळं आयुष्यं पंख्यांच्या फॅक्टरी मध्ये घालवलेल्या काकांना मी कसं समजावणार कि अमेरिकेची इकॉनॉमी कोसळली तर भारतातली IT इंडस्ट्री पण खाली जाईल, आणि तसं झालं तर पुढच्या वर्षी कॉलेज मधून बाहेर पडल्यावर मला नोकरी मिळणार नाही. बराच वेळ प्रयत्नं केल्यावर मी नाद सोडला आणि त्यांच्या "बरं झालं, गोर्यांची बरी जिरली" या उत्सवात सामील झाले.

अजून एक असाच प्रसंग, कौन बनेगा करोडपती बघत असतांना तेच काका म्हणाले होते "सालं आपल्याला मिळायला पाहिजे एक करोड रुपये" उत्सुकतेने मी त्यांना विचारलं "मिळाले १ करोड तर काय कराल त्याचं?" त्यावर ते म्हणले "खूप दिवसांपासून स्वतःची कार घेऊन मुंबई फिरून यायची इच्छा होती, एक मारुती ८०० घेईन फर्स्ट क्लास, आणि अक्खा आठवडा मुंबई मध्ये चैन करेन, तसाही डोंबिवलीत माझा मावस भाऊ राहतो त्याचं घर आहेच, त्याच्याकडेच राहीन". मला हसावं का रडावं ते नं कळून, मी आपलं "अमिताभ बच्चन कसला भारी आहे ना या वयातही!" म्हणून मनातल्या मनात १ करोड मध्ये कुठल्या कुठल्या कार येतील याचा हिशोब करत परत TV  कडे तोंड फिरवलं,

तशीच गंमत माझ्या एका दूरच्या भावाची. तो मुंबई ला आला असतांना खास माझं ऑफिस बघायला म्हणून आला, security reasons साठी कंपनी कोणाही नातेवाईकांना ऑफिसच्या आत येऊ देत नाही हे सांगूनही. आता आलाच आहे तर माझ्या सोबत काम करणाऱ्यांची ओळख करून द्यावी म्हणून मी माझी प्रोजेक्ट मॅनेजर आणि २-३ टीम मेंबर्स ना घेऊन रिसेपशन मध्ये गेले. माझी प्रोजेक्ट मॅनेजर christian, केस छोटे कापलेले, आणि स्कर्ट घातला होता. तिने हॅलो केल्यावर याने तिला उत्तर देखील दिलं नाही, मलाच अवघडल्यासारखं झाला. वरून ती गेल्यावर मला म्हणाला, तुझा प्रोजेक्ट बदलून घे, नाहीतर पुढल्यावेळी तुही दिसशील  तिच्यासारखी, छोट्या कपड्यात.

असे नाना तर्हेचे कूपमंडूक मला आयुष्यात भेटत गेले आणि एक गोष्ट कळून चुकली, कि याचा जागेशी, विद्वत्तेशी किव्वा जवळ असलेल्या धनाशी काहीही संबंध नाही. काही लोक समोर खजिना पडलेला असतांना संपत्ती आली की माणसाचा कसा विनाश होतो हे बोलण्यात आयुष्य घालवतात तर काही दुसऱ्यांनाही त्या खजिन्याचा लाभ घेऊ देत नाहीत, तसे हे कूपमंडूक आजूबाजूला बघण्यासारख्या आणि अनुभवण्यासारखा लाखो गोष्टी असतांना, जन्माला येतांना घेऊन आले तेवढेच विचार आणि अनुभव पदराशी बांधून आयुष्य घालवण्यात धन्यता मानतात, आणि दुसऱ्यांनाही आयुष्य जगण्यापासून परावृत्त करतात. त्यांना कधी परकी भाषा शिकण्यातली गम्मत कळतंच नाही, ना कधी वेगळं काही अनुभवण्यातली मजा. जगातला सगळ्यात कुशल chef यांना आणून दिला तरी ते कैरीचं लोणचं miss करण्यात आनंद मानतील.

© गायत्री गद्रे

तुम्हाला आवडेल असं अजून काही - 


बुवा आहे तिकडे